लोकवाहिनी न्यूज,नागपूर : जगातील सर्व संस्कृती जास्तीत जास्त ४ हजार वर्षे जुन्या आहेत, मात्र आधुनिक पद्धतीने काढलेले वेदांचे वय हे १२ हजार वर्षांहून अधिक आहे. जगातील सर्वात प्राचीन साहित्य असलेले वेद समृद्ध जीवन पद्धती सांगणारे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
घोगली येथे निरंजनभाई वेद पाठशाळेचे उद्घाटन रविवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर गोविंद देव गिरी महाराज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. आपली प्राचीन परंपरा पुढे नेण्यासाठी सुरू करण्यात आलेला वेद पाठशाळेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
ज्ञान-विज्ञानाचा आधार वेदच आहेत. सनातन धर्म संपूर्ण मानव जातीचे कल्याण सांगतो. हिंदू जीवन ही जगातील आदर्श पद्धती असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
वेद हेच आपले मूळ धन असल्याचे सांगून गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा पायाच वेद आहे. जगातील सर्व संस्कृती आणि भाषांचा जन्म वेदानंतर झाला आहे. वेद हे केवळ हिंदूंसाठी नाही तर मानव जातीच्या कल्याणासाठी असल्याचे गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले.
प्रारंभी रोशन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. आचार्य सागर शर्मा, नरेंद्र झा प्रभृती व्यासपीठावर उपस्थित होते.








