लोकवाहिनी न्यूजनागपूर : उबाठाचे खासदार संजय राऊत यांची बुद्धी किती भ्रष्ट होऊ शकते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत. काँग्रेसच्या संपर्कात आल्यापासून त्यांचा पूर्णपणे वैचारिक पराभव झाला असून, त्यांनी केवळ वैचारिक दिवाळखोरी पत्करली आहे, अशा कडक शब्दांत कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी संजय राऊत यांच्यावर राजकीय प्रहार केला.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधतानाच उद्धव ठाकरे गटाच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जयस्वाल पुढे म्हणाले की, संजय राऊत हे जाणीवपूर्वक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हिंदुविरोधी भूमिकेमुळे जनतेने त्यांना नाकारले, तशीच परिस्थिती महाराष्ट्रात ‘उबाठा’ गटाची होईल.
उद्धव ठाकरेंच्या काळात विदर्भावर अन्याय झाल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, ठाकरेंच्या नेतृत्वात विदर्भातील एकाही व्यक्तीला विधान परिषदेत संधी मिळाली नव्हती; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना संधी देऊन विदर्भाचा सन्मान राखला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मोठा व्हावा असे वाटते आणि एकनाथ शिंदे त्या दृष्टीने योग्य पावले उचलत आहेत.
मंत्रिमंडळातील संभाव्य खांदेपालटाबाबत बोलताना जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, एकनाथ शिंदे हे आमचे सर्वोच्च नेते असून कोणाला कोणते मंत्रीपद द्यायचे, हा सर्वस्वी त्यांचा विशेषाधिकार आहे. मला शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रीपदाबाबत कोणताही शब्द देण्यात आलेला नाही आणि या विषयावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही भूमिका जाहीर करेपर्यंत इतरांनी भाष्य करणे अयोग्य आहे.
राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करताना त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय न्याय संहितेनुसार आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विद्यमान कायद्याने आरोपींना जरब बसली नाही, तर सरकार कायद्यात बदल करण्याचाही विचार करेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.








