लोकवाहिनी न्यूज
नागपूर : जीएमआर विमानतळ प्रकरणी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून देण्यासाठी केलेल्या निर्णायक हस्तक्षेपाबद्दल आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) तर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच रामगिरी येथे सत्कार करण्यात आला. विदर्भ आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
एआयडीचे मानद सचिव डॉ. विजयकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यामध्ये एआयडीचे उपाध्यक्ष गिरिधारी मंत्री, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, कार्यकारिणी सदस्य प्रशांत उगेमुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कपिल चांद्रायन आणि कार्यसचिव पंकज भोकरे यांचा समावेश होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करून त्यांना आभारपत्र सादर करण्यात आले. केंद्र सरकारकडे सातत्याने केलेला पाठपुरावा तसेच प्रदेशातील पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक परिसंस्था बळकट करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल शिष्टमंडळाने कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना डॉ. विजयकुमार शर्मा यांनी सांगितले की, जीएमआर विमानतळ प्रकल्पाला मिळालेली मंजुरी नागपूरचे देशातील विमानवाहतूक, कार्गो, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि गुंतवणूक केंद्र म्हणून स्थान अधिक मजबूत करेल. या निर्णयामुळे औद्योगिक विकासाला गती मिळेल, संपर्क व्यवस्था सुधारेल, नवीन गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगारनिर्मितीला चालना मिळेल तसेच उद्योग व्यवसायासाठी अनुकूल वातावरण अधिक बळकट होईल. महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावणाऱ्या औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दलही एआयडीने त्यांचे विशेष कौतुक केले. राज्याच्या वेगवान औद्योगिकीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शासनासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची आपली बांधिलकी एआयडीने यावेळी पुन्हा अधोरेखित केली.
विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल
जीएमआर विमानतळ प्रकरण मार्गी लागल्यामुळे उद्योग क्षेत्र, व्यावसायिक समुदाय, लॉजिस्टिक्स क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांमध्ये नव्याने विश्वास निर्माण झाला असून, नागपूर आणि विदर्भाला गुंतवणूक व आर्थिक विकासासाठी पसंतीचे केंद्र बनविण्यात या निर्णयाची परिवर्तनकारी भूमिका राहील, असा विश्वास एआयडीने व्यक्त केला.









