लोकवाहिनी न्यूज जगदलपूर : छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआइए) विशेष न्यायालयाने बुधवारी २०१३ च्या झीरम घाटी माओवादी हल्ल्यातील सर्व १० दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. या हल्ल्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह २९ जणांचा मृत्यू झाला होता.
एनआइएच्या एका वकिलाने सांगितले की, जगदलपूर येथील विशेष एनआइए न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी दोन महिलांसह सर्व १० आरोपींना दोषी ठरवले होते आणि शिक्षेचा निर्णय १६ सप्टेंबरसाठी राखून ठेवला होता. त्यांनी सांगितले की, न्यायालयाने सर्व १० दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. २५ मे २०१३ रोजी बस्तर जिल्ह्यातील दरभा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झीरम घाटी परिसरात राष्ट्रीय महामार्गावर माओवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात काँग्रेस नेते, नागरिक आणि १० सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान २९ जण ठार झाले आणि ३० हून अधिक जण जखमी झाले.
मृतांमध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नंद कुमार पटेल आणि त्यांचे पुत्र दिनेश, माजी विरोधी पक्षनेते महेंद्र कर्मा, माजी केंद्रीय मंत्री विद्या चरण शुक्ला आणि ज्येष्ठ नेते व माजी आमदार उदय मुदलियार यांचा समावेश होता. त्याच वर्षी नंतर होणाऱ्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रैली आयोजित करण्यात आली होती.
या घटनेनंतर छत्तीसगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला, परंतु रमण सिंह यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन भाजप सरकारने हल्ल्याच्या दोन दिवसांच्या आत तपास एनआइएकडे सोपवला. राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी, तत्कालीन छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक न्यायिक आयोगही स्थापन केला.














